रविवार, ५ नोव्हेंबर, २०२३

अजी म्या देवाचा गणगोत पहिला...!

 रिक्षावाला खूप आपुलकीचा होता. त्याने सांगितले... काहीच वेळापूर्वी एक माणूस इथे आला होता. एकही कपडा अंगावर नसलेल्या या बाईला बघून, त्याने त्याचा घातलेला पॅन्ट काढला आणि या हिला स्वतः घालून दिला. स्वतःचा नवीन शर्ट काढला आणि तोही घालून दिला. स्वत: मात्र, तो चड्डीवरच आपल्या बाईकने निघून गेला. हे ऐकून अंग शहारले होते.

------
अजी म्या देवाचा गणगोत पहिला...!

अध्यात्मात चमत्काराला नव्हे तर साक्षात्काराला आणि त्याहून अधिक महत्व अनुभूतीला आहे, असे म्हणतात...

 याचा अर्थ, मी काही इथे धर्म-अध्यात्माचे विवेचन वगैरे करणार नाही. माझ्या मते मी सध्या तरी ब्रह्म-कर्माच्या प्रांतात आलेलो नाही आणि आलो असेलही तरी त्या संदर्भातला साक्षात्कार अद्याप झालेला नाही, अनुभूती आलेली नाही. तो आयामातला क्षण असतो, असेही म्हटले जाते.
‘अजी म्या देवाचा गणगोत पहिला...!’ हे जे मतीर्वन लिहिले आहे, त्याचा मथितार्थ म्हणजे मला झालेला भौतिक साक्षात्कार होय.
मी पत्रकारिता क्षेत्रात असल्याने स्वाभाविकच रात्रीचा किडा आहे. एका अर्थाने रात्री उशिरापर्यंत काम करावे लागत असल्याने, उशिराने घरी जाणे आलेच आणि त्यायोगे रात्री उशिरापर्यंत जागरणही...
बुधवार, १ नोव्हेंबर २०२३ला नेहमीप्रमाणे रात्री १२.३० वाजता मी ऑफिसबाहेर पडलो. सोबत माझे सहकर्मी पत्रकार सुनील चरपे होते. त्यांचे कृषी क्षेत्रातील ज्ञान, चिकित्सा आणि त्यांचे शोधन बघता, मी त्यांना प्रेमाने कृषीगुरुजी अशी हाक मारत असतो. दिवसभराच्या घडामोडींवर चर्चा करत बैद्यनाथ चौकातून ते आपल्या घराकडे वळले आणि मी सरळ आपल्या घराकडील मार्गाने लागलो. अशोक चौक पार करत असताना चौकाच्या मधोमध मला एक पुसटशी प्रतिमा जाणवली. ती प्रतिमा म्हणजे काही सावली, आत्मा किंवा भुताटकी वगैरे नव्हती. ती एक बाई होती. मला ती विवस्त्र जाणवली. परंतु, रात्री घराकडे जाण्याच्या धुंदीत त्याकडे फार असे लक्ष दिले नाही. आणि उत्तररात्री कशाला कुणाच्या भानगडीत पडायचे, ही एक भीतीही होतीच. मी आपला ग्रेट नाग रोडने पुढे निघालो.
अशोक चौक पार करताच, उजव्या हाताला नागोबाचे छोटेसे देऊळ आहे. दहा मिटर अंतरावर दुर्गेचे मंदिर आहे आणि मंदिरावर शिवशंकराचे मोठे चित्र आहे. डाव्या हाताला श्री गजानन महाराजांचे आणि दहा मिटर अंतरावर हनुमंताचे देऊळ आहे. नेहमीप्रमाणे या सर्व देवळातील देवतांना नमस्कार करत आणि नियमित मंत्रजाप करत पुढे निघालो. आणि मन अस्वस्थ झाले. क्षणार्धात विचारांचा हलकल्लोळ उठला आणि चिंतन सुरु झाले. स्वतःला मूर्ख, भित्रट, बोगस आदी सर्व विशेषणे देणे सुरु झाले. अर्धरात्री एक असहाय स्त्री विवस्त्र दिसली असताना, मी त्याकडे कानाडोळा करून, भीती बाळगून पुढे निघालो. त्यावर देवांना नमस्कारही करतो आहे आणि मंत्रजाप करून, मी काय साध्य करतो आहे, असा प्रश्न मला त्यावेळी पडला. शेवटी नमस्कार केलेला हनुमंत आत्ताच अवतरेल आणि सनकन माझ्या थोबाडीत मारेल, असे मला त्यावेळी वाटून गेले. मला मी मनुष्य असल्याची लाज वाटायला लागली आणि मी करत असलेल्या माणुसकीच्या गोष्टी फालतू वाटायला लागल्या.
उत्तररात्र असल्याने आणि हिवाळ्याचेच दिवस असल्याने गारठा जास्त जाणवत होता. मला आठवले आज मी गडबडीत स्वेटर घातली नव्हती. ती माझ्या पिशवीत होती. मी तडक रेशीमबाग चौकातून गाडी वळवली आणि अशोक चौकातील नागोबाच्या देवळाजवळ असलेल्या सिग्नलजवळ उभी केली. विवस्त्र अवस्थेतील ती बाई त्याच जागी उभी होती. मी स्वेटर काढली आणि तिच्या दिशेने चालायला लागलो. तेवढ्यात मागून आवाज आला, दादा टेन्शन नको, आम्ही पण तुमच्या सोबत आहोत. जणू, घाबरू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे... असा तो धिर होता. विशेष म्हणजे त्या अर्धरात्री जो आवाज आला तो एका तरुण मुलीचा होता. एक मुलगा आणि त्याच्या मागे दोन मुली, त्या विवस्त्र बाईसाठी काही कपडे घेऊन आले होते.
नंतर मी फक्त बघ्याच्या भूमिकेत होतो. त्या तिघांनी तिला टी-शर्ट घालून दिली. जवळच एक ई-रिक्षावाला होता आणि रात्री समारंभात जेवणाची कामे आटोपून आलेल्या काही ताई-बाई-अक्का होत्या. त्यांनीही आपल्याकडील शाल आणि एक चादर तिच्यावर ओढली.
रिक्षावाला खूप आपुलकीचा होता. त्याने सांगितले... काहीच वेळापूर्वी एक माणूस इथे आला होता. एकही कपडा अंगावर नसलेल्या या बाईला बघून, त्याने त्याचा घातलेला पॅन्ट काढला आणि या हिला स्वतः घालून दिला. स्वतःचा नवीन शर्ट काढला आणि तोही घालून दिला. स्वत: मात्र, तो चड्डीवरच आपल्या बाईकने निघून गेला. हे ऐकून अंग शहारले होते.
त्यानंतर तिला मदत करण्यासाठी बरेच जन पुढे आले. अखेर मीच विचारले, तुझे घर कुठे, तू कोण... तेव्हा तिने तिचे नाव मंगला परसराम चौधरी असे सांगितले. हसनबाग परिसरातील सहकारनगरमध्ये प्लॉट नंबर ३२ असा पत्ता तिने सांगितला. मी सोडून देतो म्हटल्यावर सुरुवातीला आलेले तीघे सांची, साक्षी आणि विनीत यांनी मला तुम्ही एकटे जाऊ नका, आम्ही सोबत येतो म्हणाले. तिचे घर शोधले. परंतु, ते काही सापडले नाही. ती वेडसर होती, हे तेव्हापर्यंत कळून चुकले होते. वाटेत तिने मला तिच्याजवळचे सारेच पैसे देऊ केले. मी हसलो आणि तुलाच मी देतो, असे म्हटले तर ती गप्प झाली. तिच्याशी केलेल्या संभाषणातून तिरळे कुणबी, काळे देव, नवरा, केस दान केले अशा गोष्टी कळल्या. अखेरचा पर्याय म्हणून तिला नंदनवन पोलीस ठाण्यात रात्री १.३० वाजता पोहोचवले आणि पोलिसांच्या सांगण्यानुसार आम्ही घराकडे परतलो.   
तर, अशा तऱ्हेने मला देवाचा गणगोत सापडला. मदत सगळ्यांनाच करायची असते. परंतु, नको त्या भानगडींमुळे कुणी सरसावत नाहीत. एकाने पुढाकार घेतला की सगळ्यांची पाऊले पटापटा येतात. म्हणाल तर तुम्ही केलेल्या चांगल्या कार्याला देवच पाठींबा देतो. माणसात देव असतो ना किंवा माणसात देव शोधावा म्हणतात ना... मग या घटनेत ‘अजी म्या देवाचा गणगोत पहिला...’ असे म्हटले तर काय गैर आहे.

वंदे मातरम

प्रवीण खापरे
..........

बुधवार, २ ऑगस्ट, २०२३

Geeta or Sanvidhan

 *गीता या संविधान?* 

 हा प्रश्नच मुळी किती मूर्खपणाचा वाटतो आणि हा प्रश्न उपस्थित करणारे किती बालबुद्धीचे व उत्तर देणारे बुद्धीजीवी कसे आपमतलबी आहेत, हे सिध्द होते. 

स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या विचारांवर आधारित सहा-सात वर्षापूर्वी मी लिहिलेल्या  ‘वि...’ या नाटकात भारतीय संविधानावर एक वाक्य आहे. ‘देशाला चालविणारे सकारात्मक विधान म्हणजे संविधान. म्हणून, संविधान हे माझ्यासाठीच नव्हे तर समस्त राष्ट्राभक्तांसाठी राष्ट्रग्रंथ आहे.’   

 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा संविधान देशापुढे ठेवले तेव्हा संविधानावर अनेक स्तरावरून नकार म्हणा वा विरोध केला होता, असे तत्कालीन अनेक लेखांवरून, तत्कालीन नोंदींवरून स्पष्ट होते. मात्र, सावरकरांनी याच संविधानाला डोक्यावर घेतले होते आणि संविधानाची स्तुती करणारा पहिला लेख त्यांनी प्रसिध्द केल्याचे सांगितले जाते. त्याच लेखात त्यांनी संविधानाला राष्ट्राग्रंथ म्हणून गौरवले होते. नांदेडचे सावरकर विचारांचे विश्लेषक डॉ. पुरुषोत्तम मोरे यांच्या एका व्याख्यानात मी हे ऐकले होते. 

*आता, गीता (श्रीमदभगवतगीता) की संविधान? या प्रश्नावर येऊ...* 

मी दोन्ही अद्याप वाचलेले नाही. केवळ त्यांचे सारांश तेवढे वाचले आहेत. त्यामुळे, या दोन्ही महान ग्रंथांवर बोलण्याचा मी अधिकारी तर नक्कीच नाही. सध्या दोन्ही ग्रंथ टप्प्या टप्प्यात वाचण्याचा मी प्रयत्न करतो आहे आणि ते समजून घेत आहे. मात्र, गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेला उपदेश, जीवन दर्शन म्हणून मानवी जीवनासाठी किती महत्वाचा आहे, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. ज्यांना गीता समजून घ्यायचीच नसेल, त्यांना सांगून अर्थही नाही. याच गीतेमध्ये राष्ट्राला अनन्य साधारण महत्व दिले गेले आहे. एका अर्थाने, मनुष्य ज्या भूमीमध्ये जन्मतो तिला ‘जननी जन्मभूमी’ अर्थात माता म्हटले आहे. अर्थात देशाशिवाय अन्य कोणतेही नाते, अन्य कोणतेही कर्तव्य मोठे नाही. एवढेच नव्हे तर सर्वच पुराण, निषद-उपनिषदांमध्येही जन्मभूमीला सर्वोच्च स्थान दिले आहे. 

अनेक तज्ज्ञ विश्लेषकांच्या तोंडून श्रीमदभगवतगीता सार ऐकण्याचे, लिखाणांतून वाचण्याचे भाग्य लाभले, त्यात श्रीमदभगवतगीता ही अखिल मानवतेसाठी जीवन जगण्याचे सर्वोच्च ग्रंथ असल्याचेच स्पष्ट होते. एका अर्थाने गीता ही मनुष्य प्राण्याला कर्तव्योन्मुख करणारे महान ग्रंथ आहे. आणि संविधान हे देशाला चालविणारे राष्ट्रग्रंथ आहे. मग, तुम्ही प्रथम कोणते ग्रंथ मानता? गीता की संविधान? हा प्रश्न उपस्थित करणे संयुक्तिक ठरते का?

एक हिंदू म्हणून, माझ्यासाठी श्रीमदभगवतगीता सर्वोच्च आहे आणि श्रीमदभगवतगीतेच्या उपदेशानुसार जन्मभूमीविषयीची कर्तव्य भावना सर्वप्रथम ठरते. विविध मतांचा आदर करत आधुनिक भारत हा संविधानानुसार चालतो आहे. आणि संविधान निर्माते हे काही परके नाहीत. ते भारतीयच आहेत. मग, श्रीमदभगवतगीतेच्या उपदेशानुसारच देशाला अनुकूल असे संविधान न मानण्याचे कोणतेही कारण कोण्याही हिंदुच्या मनात नक्कीच नाही. उलट देशात संविधानाचा सर्वाधिक सन्मान हिंदुंव्यतिरिक्त कोणी करत असेल, अशी शंकाच वाटते! कारण, जेव्हा स्वार्थ पुढे येतो तेव्हा काहींना संविधान आठवतो आणि हेच संविधान जेव्हा काहींच्या स्वार्थावर बोट ठेवते, तेव्हा त्याला अन्याय संबोधले जाते.

शेवटी.... “देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो” हे सावरकरांचे वाक्य “गीता की संविधान’ प्रश्नाला समर्पक असे उत्तर ठरते. कारण जो श्रीमदभगवतगीतेला सर्वोच्च मानतो, त्याच्यासाठी संविधान कुठेच कमी नाही... संविधान श्रेष्ठच ठरते. 


प्रवीण खापरे,

पत्रकार व नाट्यलेखक, दिग्दर्शक

७५०७७७५८९७

सोमवार, २ जानेवारी, २०२३

ज्ञान-विज्ञान-अनुसंधान


ज्ञान
-विज्ञान-अनुसंधान


ज्ञान-विज्ञान अदम्य साहस तथा विश्वास से जुडा अनुसंधान है, 
वहाँ अंधविश्वास काे कोई स्थान नहीं,
विश्वास के साथ संदेह, अपार संभावनाओं को जन्म देता है,
अविश्वास के साथ नकार, अनुसंधान के राह में रोडे है...

- बाळराजे