बुधवार, २ ऑगस्ट, २०२३

Geeta or Sanvidhan

 *गीता या संविधान?* 

 हा प्रश्नच मुळी किती मूर्खपणाचा वाटतो आणि हा प्रश्न उपस्थित करणारे किती बालबुद्धीचे व उत्तर देणारे बुद्धीजीवी कसे आपमतलबी आहेत, हे सिध्द होते. 

स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या विचारांवर आधारित सहा-सात वर्षापूर्वी मी लिहिलेल्या  ‘वि...’ या नाटकात भारतीय संविधानावर एक वाक्य आहे. ‘देशाला चालविणारे सकारात्मक विधान म्हणजे संविधान. म्हणून, संविधान हे माझ्यासाठीच नव्हे तर समस्त राष्ट्राभक्तांसाठी राष्ट्रग्रंथ आहे.’   

 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा संविधान देशापुढे ठेवले तेव्हा संविधानावर अनेक स्तरावरून नकार म्हणा वा विरोध केला होता, असे तत्कालीन अनेक लेखांवरून, तत्कालीन नोंदींवरून स्पष्ट होते. मात्र, सावरकरांनी याच संविधानाला डोक्यावर घेतले होते आणि संविधानाची स्तुती करणारा पहिला लेख त्यांनी प्रसिध्द केल्याचे सांगितले जाते. त्याच लेखात त्यांनी संविधानाला राष्ट्राग्रंथ म्हणून गौरवले होते. नांदेडचे सावरकर विचारांचे विश्लेषक डॉ. पुरुषोत्तम मोरे यांच्या एका व्याख्यानात मी हे ऐकले होते. 

*आता, गीता (श्रीमदभगवतगीता) की संविधान? या प्रश्नावर येऊ...* 

मी दोन्ही अद्याप वाचलेले नाही. केवळ त्यांचे सारांश तेवढे वाचले आहेत. त्यामुळे, या दोन्ही महान ग्रंथांवर बोलण्याचा मी अधिकारी तर नक्कीच नाही. सध्या दोन्ही ग्रंथ टप्प्या टप्प्यात वाचण्याचा मी प्रयत्न करतो आहे आणि ते समजून घेत आहे. मात्र, गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेला उपदेश, जीवन दर्शन म्हणून मानवी जीवनासाठी किती महत्वाचा आहे, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. ज्यांना गीता समजून घ्यायचीच नसेल, त्यांना सांगून अर्थही नाही. याच गीतेमध्ये राष्ट्राला अनन्य साधारण महत्व दिले गेले आहे. एका अर्थाने, मनुष्य ज्या भूमीमध्ये जन्मतो तिला ‘जननी जन्मभूमी’ अर्थात माता म्हटले आहे. अर्थात देशाशिवाय अन्य कोणतेही नाते, अन्य कोणतेही कर्तव्य मोठे नाही. एवढेच नव्हे तर सर्वच पुराण, निषद-उपनिषदांमध्येही जन्मभूमीला सर्वोच्च स्थान दिले आहे. 

अनेक तज्ज्ञ विश्लेषकांच्या तोंडून श्रीमदभगवतगीता सार ऐकण्याचे, लिखाणांतून वाचण्याचे भाग्य लाभले, त्यात श्रीमदभगवतगीता ही अखिल मानवतेसाठी जीवन जगण्याचे सर्वोच्च ग्रंथ असल्याचेच स्पष्ट होते. एका अर्थाने गीता ही मनुष्य प्राण्याला कर्तव्योन्मुख करणारे महान ग्रंथ आहे. आणि संविधान हे देशाला चालविणारे राष्ट्रग्रंथ आहे. मग, तुम्ही प्रथम कोणते ग्रंथ मानता? गीता की संविधान? हा प्रश्न उपस्थित करणे संयुक्तिक ठरते का?

एक हिंदू म्हणून, माझ्यासाठी श्रीमदभगवतगीता सर्वोच्च आहे आणि श्रीमदभगवतगीतेच्या उपदेशानुसार जन्मभूमीविषयीची कर्तव्य भावना सर्वप्रथम ठरते. विविध मतांचा आदर करत आधुनिक भारत हा संविधानानुसार चालतो आहे. आणि संविधान निर्माते हे काही परके नाहीत. ते भारतीयच आहेत. मग, श्रीमदभगवतगीतेच्या उपदेशानुसारच देशाला अनुकूल असे संविधान न मानण्याचे कोणतेही कारण कोण्याही हिंदुच्या मनात नक्कीच नाही. उलट देशात संविधानाचा सर्वाधिक सन्मान हिंदुंव्यतिरिक्त कोणी करत असेल, अशी शंकाच वाटते! कारण, जेव्हा स्वार्थ पुढे येतो तेव्हा काहींना संविधान आठवतो आणि हेच संविधान जेव्हा काहींच्या स्वार्थावर बोट ठेवते, तेव्हा त्याला अन्याय संबोधले जाते.

शेवटी.... “देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो” हे सावरकरांचे वाक्य “गीता की संविधान’ प्रश्नाला समर्पक असे उत्तर ठरते. कारण जो श्रीमदभगवतगीतेला सर्वोच्च मानतो, त्याच्यासाठी संविधान कुठेच कमी नाही... संविधान श्रेष्ठच ठरते. 


प्रवीण खापरे,

पत्रकार व नाट्यलेखक, दिग्दर्शक

७५०७७७५८९७